कोरोना महामारीने पुन्हा मान वर काढली आहे. विशेषतः पुणे शहरात गेल्या दहा दिवसांत कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र, सध्या आढळणारे बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांचे असल्याने आणि गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नसल्याने तज्ज्ञांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत किती रुग्ण?
राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२६ या वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रात कोविड-१९ चे ४८रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या काळात कोविडमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गेली जवळपास तीन वर्षे कोविडचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र, यावर्षी जानेवारीपासून रुग्णसंख्येत हळूहळू वाढ दिसून येत आहे. जानेवारीमध्ये ३, फेब्रुवारीमध्ये १, जूनमध्ये ११ आणि जुलै महिन्यात आतापर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, बहुतांश रुग्ण नियमित कोविड चाचण्यांमधून समोर आलेले नाहीत. इतर आजारांवरील उपचारादरम्यान किंवा शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये हे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत.
कोणती लक्षण जाणवतात?
सध्या आढळणारा संसर्ग ओमिक्रॉन प्रकारापेक्षाही सौम्य असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. रुग्णांमध्ये खोकला, सर्दी, घशात खवखव, थकवा यांसारखी लक्षणे दिसत असून ती साधारण तीन ते पाच दिवसांत कमी होत आहेत. त्यामुळे घाबरण्याऐवजी सतर्क राहणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, कोविड आता इन्फ्लूएंझाप्रमाणे कायम राहू शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेणे, नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आवश्यक असल्यास तपासणी करणे गरजेचे आहे.
आंधरप्रदेशमध्ये आढळले कोरोनाचे १२ रुग्ण
आंधरप्रदेशमध्ये देखील गेल्या महिनाभरात कोरोनाचे १२ रुग्ण सापडले असून त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशचे आरोग्य आयुक्त जी. वीरपांडियन यांनी सांगितले की, २६ जून ते १६ जुलै दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी कोविड-१९ चे एकूण १२ रुग्ण आढळले आहेत. मृत्यू पावलेल्या चार रुग्णांना हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, किडनी स्टोनचा आजार होते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आणि जेव्हा रुग्णांना कोविड-१९ ची लागण झाली , तेव्हा त्यांचे शरीर त्याचा सामना करू शकले नाही.















