kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बिहारच्या किशनगंजमध्ये गूढ आजाराने तीन मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

बिहारमध्ये एका गूढ आजारामुळे दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या आजारामुळे आतापर्यंत तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका मुलावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील कथलबारी गावामध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

कथलबारी गावात एका गूढ आजारामुळे दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या आजारामुळे आतापर्यंत तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका मुलावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता किशनगंजचे जिल्हाधिकारी विशाल राज यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकासह गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

या घटनेनंतर जिल्हा आरोग्य समिती आणि प्रशासनाने तातडीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मृत मुलांच्या आरोग्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाटणा येथे पाठवण्यात आले आहेत. या नमुन्याच्या सविस्तर तपासणीनंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, संसर्गजन्य आजारामुळे ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, याबाबतचा तपासणी अहवाल समोर आल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासन व आरोग्य विभागाचे पथक गावात तळ ठोकून आहेत. तसेच सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.

डॉक्टरांनी काय माहिती दिली?

बिहारमधील किशनगंज येथील एकाच कुटुंबातील तीन मुलांचा गूढ आजाराने मृत्यू झाला आहे. तसेच एकजण गंभीर असून या घटनेमुळे गावात मोठी घबराट पसरली आहे. या संदर्भात किशनगंजचे मुख्य चिकित्सक डॉ. देवेंद्र प्रसाद यांनी माहिती देताना सांगितलं की, “या घटनेतील मृत्यूचे कारण समजण्यासाठी अहवाल पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. डेंग्यू आणि एन्सेफलायटीस ही संभाव्य कारणे असल्याचं प्राथमिक तपासणीत दिसते आहे. अशा प्रकारची तत्सम लक्षणे आढळून आली आहेत. सध्या या ठिकाणी वैद्यकीय पथकाने कॅम्प लावला आहे. तसेच आशा वर्कर्सच्या माध्यमातून आम्ही येथे एक सर्वेक्षण करत आहोत. १० वर्षांखालील मुलांचे पोषण आणि लसीकरण पातळी तपासली जाणार आहे”, असं डॉ. देवेंद्र प्रसाद यांनी सांगितलं.