पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कार अपघाताची देशभरात चर्चा असतानाच आता मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली आणि त्या दोघांना फरफटत नेलं. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी पहाटे ५.३० वाजता हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर अपघात प्रकरणात बीएमडब्लू वाहनाचे मालक राजेश शाह शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती टाइम्स नाऊ या संकेतस्थळाने दिली. राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह हा अपघातावेळी वाहन चालवत असल्याचा दावा पीडित कुटुंब आणि प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

अपघातानंतर दाम्पत्याला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुर्दैवाने महिलेचा यात मृत्यू झाला. तर तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बीएमडब्लू वाहन ताब्यात घेतलं असून अपघातानंतर चालकाने पळ काढला होता. त्यालाही आता ताब्यात घेण्यात आले आहे. वरळी पोलीस ठाण्यात सदर अपघाताची सखोल चौकशी केली.

वरळी अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया :

माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या अपघातानंतर माझी पोलिसांशी चर्चा झाली. कायद्यासमोर सर्वच समान असतात. सरकार सर्वच घटनांना एकसमान पाहते. ही घटना काही वेगळी नाही. आम्ही कुणालाही वाचविण्याचे काम करणार नाही. घडलेली घटना अतिशय दुःखद आहे. असे अपघात पुन्हा घडू नये, असा सरकारचा प्रयत्न असेल. कायद्यानुसार आरोपींवर कारवाई केली जाईल.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाणे गाठून पोलिसांकडून माहिती घेतली. तसेच पीडित नाखवा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विरोधकांचे कामच विरोध करणे आहे. पण आमचे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. तो आमचा पदाधिकारी असला तरी सर्वांना समान न्याय लागू करण्याचे काम आम्ही करू.

वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी न्याय मिळवून देण्याचे दिले आश्वासन :

वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी वरळी पोलीस ठाण्यातील पोलिसांची भेट घेतली आणि या प्रकरणात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई केली, याची माहिती घेतली. तसेच त्यांनी पीडित नाखवा कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतल्यानंतर माध्यमांशी संवाध साधला. ते म्हणाले, “आज सकाळी वरळीत हिट अँड रनची घटना घडली. या घटनेतील आरोपी चालक फरार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले आहे. या घटनेतील जो तरुण आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे.”

“या घटनेतील आरोपी कोणत्याही पक्षाचा असला, तरी मी या घटनेचे राजकारण करणार नाही. मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. माझी मागणी आहे की, जो गाडी चालवत होता, त्या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. या घटनेत कुठलाही राजकीय हस्तक्षेप व्हायला नको”, अशी अपेक्षाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया :

या अपघातानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “अत्यंत घृणास्पद असा हा गुन्हा आहे. वाहन चालकाने जर वेळीच ब्रेक मारला होता आणि तो तिथेच थांबला असता तर आमच्या नाखवा वहिनी आज जिवंत असत्या”, अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली.

संदीप देशपांडे यांनी या अपघाताविषयी माध्यमांना माहिती दिली. अपघातानंतर जखमी नाखवा यांच्याशी फोनवर बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. नाखवा यांनी देशपांडेंना दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ते स्वतः वाहनाच्या बोनेटवर पडले. त्यांच्या अंगावर त्यांच्या पत्नी पडल्या. बीएमडब्लू वाहन चालकान जेव्हा ब्रेक मारला तेव्हा ते दोघेही खाली पडले. नाखवा गाडीच्या बाजूला पडले तर त्यांच्या पत्नी गाडीच्या चाकासमोरच पडल्या.

“बीएमडब्लू वाहन चालकाने जर ब्रेक मारल्यानंतर गाडी चालू केली नसती तर नाखवा वहिनी आज जिवंत असत्या. वाहन चालकाने पळून जाण्याच्या नादाता त्यांना १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यामुळे वाहन चालकावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहीजे. जो कुणी आरोपी असेल त्यावर कडक कारवाई करावी”, अशी मागणी केली असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, आरोपीचे कुठलेही राजकीय संबंध असले तरी त्यांना सोडता कामा नये. अशा गुन्हेगारांचे राजकीय संबंध असले तरी आम्ही त्यांना सोडू देणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करत राहू.

नेमकं काय घडलं ?

वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ पहाटे ५.३० वाजता अपघात घडला. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात नाखवा दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉक येथे मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या बीएमडब्लू वाहनाने धडक दिली. दुचाकीवर मासळी असल्यामुळे दुचाकी चालवत असलेल्या नाखवा यांचे दुचाकीवर नियंत्रण सुटले. त्यामुळे पती-पत्नी वाहनाच्या बोनेटवर धडकले. वाहनाने ब्रेक मारल्यानंतर नाखवा बाजूला पडले. मात्र त्यांच्या पत्नीला वेळीच बाजूला होता आले नाही. त्यातच बीएमडब्लूच्या चालकाने वाहन पळविल्यामुळे त्या वाहनाबरोबर १०० मीटरपर्यंत फरफटत गेल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.