काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याने रविवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तुरुंगातील शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला, असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता गवळी याच्या कुटुंबीयांनी विशालची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
विशाल गवळीच्या कुटुंबीयांनी प्रशासनावर मोठा आरोप केला आहे. विशालची हत्या करण्यात आली आहे. त्याला फसवले आहे, असा आरोप त्याच्या आई वडिलांनी केला आहे. विशालच्या आईने सांगितले की, मला सकाळी सात वाजता पोलिसांनी फोन केला. यावेळी त्यांनी मला विशालने आत्महत्या केली असं सांगितलं. माझा मुलगा कधी आत्महत्या करणारच नाही. तो नेहमी आत्महत्या करणे पाप आहे म्हणायचा. हे राजकारण झालं आहे. पोलिसांना पैसे देऊन हे सगळं केलं आहे, असा गंभीर आरोप विशालच्या आईने केला.
“विशालसोबत माझं आठ दिवसापूर्वी बोलण झालं होतं. विशालने आत्महत्या केलीच नाही. हे सगळं राजकारण सुरू आहे. विशालला फसवलं आहे, असा आरोप विशालच्या वडिलांनीही केला.
कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. डिसेंबर २०२४ मध्ये घडलेल्या या गुन्ह्या प्रकरणी आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, सध्या तळोजा कारागृहात असलेल्या विशाल गवळी याने टोकाचं पाऊल उचलत तुरुंगामध्येच गळफास लावून जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. गवळी याने तळोजा कारागृहातील बाथरूममध्ये गळफास लावून जीवन संपवलं.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या विशाल गवळी याने कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्यानंतर त्याने या मुलीचा मृतदेह सुमारे १३ किलोमीटर दूर अंतरावर नेऊन टाकला होता. तसेच तो शेगाव येथे जाऊन लपला होता.
Leave a Reply