महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकीकडे कोणाची सत्ता राज्यात येणार ही चर्चा आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होईल याचीही चर्चा सुरु आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. लवकरच सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. पण या सगळ्यात चर्चा होत आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंच्या मावस भावाची ..!

का होतीये चर्चा ?

आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समोर येत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष जागावाटपावर चर्चा करत आहे. अशातच ठाकरे गटाचे अनिल परब यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

म्हंटल जातंय की, मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी वरुण सरदेसाई इच्छुक होते. मात्र ऐनवेळी अनिल परब यांना उमेदवारी दिल्याने वरुण सरदेसाई नाराज झाले होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून वांद्रे पूर्वे विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता अनिल परब यांनी गट प्रमुख मेळाव्यातून मोठा दावा केला आहे. वरूण सरदेसाई हे बांद्रा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत आणि ते जिंकणार असा विश्वास मला आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. यासोबतच अनिल परब यांनी महाविकासाआघाडीचे पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

दरम्यान वरुण सरदेसाई या मतदारसंघातून निवडणूक लढले तर त्यांची लढत ही आमदार झिशान सिद्दीकी यांच्या विरोधात होऊ शकते, असे बोलले जात आहे. सध्या वरुण सरदेसाई हे या मतदारसंघात मोर्चेबांधणी करत आहेत. वरुण सरदेसाई यांनी पक्षाच्या शाखांना भेटी देणं, सामाजिक उपक्रम राबवणं सुरु केलेलं आहे. तसेच त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर या सामाजिक उपक्रमांचे आणि छत्रीवाटपाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या झिशान सिद्दीकीविरुद्ध वरुण सरदेसाई यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *