दोन दिवसांपूर्वी बदलापुरात मोठ जन आंदोलन झालं. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली होती. बदलापुरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. या घटनेविरोधात बदलापूरकरांनी मंगळवारी आक्रोश व्यक्त केला. बदलापुरात शाळा परिसरात आणि रेल्वे ट्रॅकवर रेल रोको आंदोलन झालं. आठ ते दहा तास हे आंदोलन सुरु होतं. रेल्वे रुळावर बसलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलीस पोहोचले, त्यावेळी पोलिसांवर दगडफेक झाली. बदलापुरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागलेला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी काल बदलापुरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

आता बदलापूर प्रकरणाची मुंबई हाय कोर्टाने दखल घेतली आहे. याप्रकरणी कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. आज सकाळी या प्रकरणाची तातडीची सुनावणी होणार आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची हाय कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान, बदलापुरात घडलेल्या या घटनेचे तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत. सरकारने सुद्धा पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी पावल उचलली आहेत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामगिरीं महाराजांना भेटायला वेळ आहे. पण पीडित मुलीच्या घरी जायला त्यांना वेळ नाही अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत, असही त्या म्हणाल्या.