kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीर येथे रेल्वे प्रोजेक्टसह इतर अनेक विकासकामांचे पायाभरण आणि लोकार्पण केले. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देखील उल्लेख केला. मोदी म्हणाले की, पहलगाम येथे माणुसकी आणि काश्मीरच्या सांस्कृतिक ठेवा या दोन्हीवर घाव घातला. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान मानवताविरोधी असल्याचेही यावेळी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी कटरा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले की, आपला शेजारी देश मानवता, लोकांमधील चांगले संबंध, पर्यटन यांचा विरोधक आहे. हा अशा देश आहे जो गरिबांच्या व्यवसायाच्या देखील विरोधात आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये जे काही झालं ते याचे उदाहरण आहे.

पीएम मोदी यांनी पाकिस्तावर जोरदार हल्ला चढवत ते म्हणाले की, त्याचा उद्देश हा कष्टकरी लोकांची कमाई रोखणे हा होता. त्यामुळे पाकिस्तानने पर्यटकांवर हल्ला केला. पर्यटन तर गेल्या ५ वर्षात वेगाने वाढत होते. दरवर्षी येथे विक्रमी संख्येने पर्यटक येत होते. ज्या पर्यटन व्यवसायावर जम्मू-काश्मीरच्या लोकांची घरे चालतात, त्याला पाकिस्तानने लक्ष्य केले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, “पाकिस्तानने पहलगाम येथे माणुसकी आणि ‘कश्मीरियत’, या दोघांवर वार केला. त्याचा हेतू भारतात दंगली घडवण्याचा होता. काश्मीरच्या कष्टाळू लोकांची कमाई रोखण्याचा होता, त्यामुळे पाकिस्तानने पर्यटकांवर हल्ला केला.”

जम्मू आणि काश्मीरच्या तरुणांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता तरूणांनी दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. हा तोच दहशतवाद आहे ज्याने खोऱ्यात शाळा जाळून टाकल्या, रुग्णालये उद्ध्वस्त केली, ज्याने अनेक पिढ्या उद्ध्वस्त केल्या. पाकिस्तानाच्या या कटाच्या विरोधात जम्मू-काश्मीरचे लोक उभे राहिले आहेत. जम्मू-काश्मीरच्या जनतेने याविरोधात जी शक्ती दाखवली आहे त्याने फक्त पाकिस्तानच नाही तर जगभरातील दहशतवाद्यांना एक कठोर संदेश मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महिन्यापूर्वी ६-७ मेच्या रात्री झालेल्या ऑपरेशन सिंदूरचा देखील यावेळी उल्लेख केला. मोदी म्हणाले की आज ६ जून आहे. योगायोगाने बरोबर एक महिन्यापूर्वी आजच्या रात्री पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर मोठं संकट कोसळलं होतं. आता पाकिस्तानला जेव्हा कधीही ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकेल तेव्हा त्यांना त्यांचा लाजिरवाणा पराभव आठवेल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानी लष्कराने आणि दहशतवाद्यांनी कधीही विचार केला नव्हता की भारत, पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर या प्रकारे वार करेल. अनेक वर्षांच्या मेहनतीतून त्यांनी ज्या इमारती उभारल्या होत्या त्या काही मिनिटांतच ओसाड पडल्या.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब आणि अंजी ब्रिजचे उद्घाटन केले आहे. याशिवाय कटरा ते श्रीनगर यांच्यात चालणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा देखील दाखवला. हे प्रकल्प जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनासाठी खूपच महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे.