अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर अवघ्या दोन मिनिटांत कोसळले. अहमदाबादमधील मेघानीनगर या भागात विमानाचा भीषण अपघात घडला. लंडनसाठी निघालेल्या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. या अपघातात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या दुर्घटनेतील मृतांची माहिती समोर येत आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात दोन ब्रिटिश सेलिब्रेटींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश सेलिब्रेटी वेलनेस गुरु जेमी मिक आणि त्यांचा नवरा फिऑनगॉल ग्रीनलॉ या दोघांचा अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. हे दोघेही भारतात सुट्ट्या घालवण्यासाठी आले होते. सुट्ट्या संपवून पुन्हा परतत असताना त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला होता.

या व्हिडीओत त्यांनी बाय बाय इंडिया असे म्हटले होते. यावेळी फिऑनगॉल म्हणाले, “आम्ही आता विमानतळावर आहोत आणि लवकरच विमानात बसू. इंग्लंडला परतण्यासाठी दहा तासांचा प्रवास आहे.” यानंतर फिऑनगॉल यांनी जेमीला तुझा भारतातील सर्वात मोठा अनुभव काय होता? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने आम्ही आनंदाने मायदेशी परतत आहोत, असे म्हटले.

विशेष म्हणजे या दोघांनीही एअरपोर्टवर चहा घेतला होता. हे दोघे मिळून द वेलनेस फाऊंड्री नावाची कंपनी चालवत होते. यावेळी ते दोघेही खूपच आनंदात दिसत होते. पण त्यांचा हा व्हिडीओ शेवटचा ठरेल याची त्या दोघानाही पुसटशीही कल्पना नव्हती. पण सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी याबद्दल ट्विट केले आहे. “अनेक ब्रिटिश नागरिकांना घेऊन जाणारे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले आहे. अपघाताचे दृश्य अत्यंत भयानक आहेत. मला या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती देण्यात येत आहे. प्रवाशांसह आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत.” असे केयर स्टारमर यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *