सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते करप्ट आहेत. त्यांना टेंडरमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. ते आईस्क्रिमही खातात तर टेंडर ब्रोकरेजचं खातात. ट्रॅक्टर आणि काँट्रॅक्टरमधला फरक त्यांना कळत नाही. ते आपल्या महाराष्ट्राचं वाटोळं करायला निघाले आहेत. मुंबईचं वाटोळं करायला निघाले आहेत. 6 हजार 80 कोटींचा घोटाळा मी एक्सपोज केला आहे. त्यावर मी आजही ठाम आहे. येणारं सरकार आपलं आहे. सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले ते जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच, असा इशारा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. गिरगावमध्ये आयोजित सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.

निवडणुकीनंतर आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. हे वर्ष आपलं आहे आणि आपलंच राहणार आहे. देशाला एक आस होती. आता दिल्लीला दाखवून द्यायचं आहे. महाराष्ट्र गाजवायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. त्यासाठीच पहिला मेळावा दक्षिण मुंबईत घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईचं खास महत्त्व आहे. सर्व कार्पोरेट ऑफिस दक्षिण मुंबईत आहेत. पण ऑफिस आता गेली कुठे? आपण असं काय बिघडवलं होतं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

काश्मीरमधलं 354 कलम रद्द केलं. मात्र महाराष्ट्रात असं काय कलम बसवलंय की त्यामुळे महाराष्ट्रावर नुसता अन्याय होतं आहे. आमच्या हक्काचं आहे ते खेचून घेऊन जाऊ नका. त्याला आमचा कायम विरोध असेल. हे खोके सरकार महाराष्ट्रद्रोही सरकार आहे. निवडणुका जशा जवळ येतील तेव्हा त्यांच्या मोठ्या अॅड येतील. बॅनर दिसतील. पण यांनी एक तरी नवा उद्योग महाराष्ट्रात आणलाय का? सरकार पडलं तेव्हा वेदांता महाराष्ट्रात पुण्यात येत होता. लाख लोकांना रोजगार मिळणार होता, असं आदित्य ठाकरे म्हणाले.