जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने हवेत गारवा पसरला होता. दरम्यान, श्रावण महिन्याला सुरूवात झाल्यानंतर एक दिवस सोमवारी ऊन पावसाचा खेळ अनुभवण्यास मिळाला. मात्र, मंगळवारी रात्री पासून पुन्हा पावसाने दमदार पुनरागमन केले आहे.

संततधार पडत असलेल्या पावसाने पाणी पातळी पुन्हा वाढली असून नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाल्याने काही धरणांमधून विसर्गालाही सुरूवात झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास भातशेतीला धोका पोहोचणार आहे. दरम्यान, जुलै महिन्याप्रमाणेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस सुरू असल्याने यावर्षी पाऊस वेळेअगोदरच सरासरी पूर्ण करण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

भातशेतीला आता पावसाची गरज नाही. कारण मागील पंधरवड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने भातशेती पाण्याखाली होती. आता पावसाने मोकळीक दिली तर भातशेती बहरण्याची शक्यता आहे.