उच्चशिक्षित असूनही शासकीय नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून २५ वर्षीय तरुणीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. राणी साहेबराव नाईकवाडे (रा- खादगाव, हल्ली मुक्काम गणेशनगर, बदनापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. राणी विज्ञान शाखेची पदवीधर होती. ती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक परीक्षांनाही सामोरे गेली होती.
उच्च शिक्षित असून देखील केवळ आरक्षण नसल्याने शासकीय नोकरी मिळत नाही. या विवंचनेत तिने राहत्या घरात तिने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मुलीचे नातेवाईक खादगाव (ता- बदनापूर) येथील सरपंच सोपान नाईकवाडे यांनी दिली आहे.
शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा नोकऱ्या मिळत नसल्याने समाजातील उच्चशिक्षित तरुण आणि तरुणी टोकाचे पाऊल उचलत असल्याची भावना अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप ताडगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, मृत राणी नाईकवाडे हिच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.