आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. कल्याण- कल्याण शीळ रस्त्यालगत मानपाडा जंक्शन ते विको नाका दरम्यान असलेली ५८ बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्याची धडक कारवाई केडीएमसी आणि एमआयडीसीने संयुक्तरित्या केली आहे. महापालिकेच्या ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि एमआयडीसीचे उपअभियंता राजेश मुळे, निवास पाटील यांनी मानपाडा पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

३२ अनाधिकृत झोपड्या, १८ वाणिज्य अनधिकृत बांधकामे, ८ गॅरेजेस अशा एकूण ५८ अनाधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई जेसीबी,हायड्रा आणि गॅस कटरच्या सहाय्याने करण्यात आली. एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रामधील कल्याण शीळ रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे मोकळ्या जागा आणि नागरी सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर होती. टाटा पॉवर लाईनच्या खाली ही बेकायदा बांधकामे होती. टाटा पॉवर लाईन ही अतिउच्च दाबाची विद्युत वाहिनी आहे. त्याखाली असलेल्या झोपड्यांमध्ये पावसाळ्यात काही अनुचित घटना होऊ नये म्हणून त्याठिकाणच्या अतिक्रमित झोपड्या हटविण्यात आल्या.