kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘प्यार जिंदगी है’ पुस्तकासाठी लेखिका अनिता पाध्ये यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषदचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. या पुरस्कारामध्ये चित्रपट विभागासाठी असणारा ‘अपर्णा मोहिले पुरस्कार’ मुंबईतील लेखिका व सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांना जाहीर झाला आहे. पाध्ये यांनी लिहिलेल्या ‘प्यार जिंदगी है’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

अनिता पाध्ये हे नाव सिनेमाविषयक लेखनामध्ये अग्रगण्य मानले जाते. गेली ४० वर्ष त्या सिनेपत्रकार व लेखिका म्हणून सिनेक्षेत्राशी जोडल्या आहेत. भारतीय सिनेमा व सिनेव्यक्तींच्या जीवनावर आधारित त्यांची अनेक पुस्तकं मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित झाली आहेत. ‘प्यार जिंदगी है’ या मराठी पुस्तकात अनिता पाध्ये यांनी हिंदी रोमॅंटिक चित्रपटांचा निर्मिती प्रवास लिहिला असून ‘देवदास’ ते ‘हम दिल दे चुके सनम’ अशा १९५० ते २००० च्या दशकातील १२ निवडक लोकप्रिय रोमॅंटिक चित्रपटांची अतिशय दुर्मिळ, रंजक माहिती सदर पुस्तकात लिहिली आहे. प्रेमाचे वेगवेगळे अविष्कार असतात. लेखिकेने प्रेमाच्या १२ छटा आपल्या या पुस्तकात सादर केल्या आहेत. सदर पुस्तकासाठी त्यांनी ४ वर्ष संशोधन केले होते. या १२ निवडक चित्रपटांशी निगडीत व्यक्तींना त्या भेटल्या होत्या. नजीकच्या काळात हे पुस्तक हिंदी भाषेमध्ये प्रकाशित होत आहे.

या पुस्तकात ‘देवदास’, ‘तेरे घर के सामने’, ‘अनुपमा’, ‘आराधना’, ‘बॉबी’, ‘छोटी सी बात ’, ‘कभी कभी ’,‘एक दुजे के लिये’, ‘कयामत से कयामत तक ’, ‘आशिकी’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटांचा वेध घेतला आहे. अनिता पाध्ये यांनी या पुस्तकामध्ये ज्या चित्रपटांचा निर्मिती प्रवास लिहिला आहे, त्यामध्ये आपल्याला अनेक रोचक प्रसंग देखील वाचायला मिळतात.

हे चित्रपट ज्या काळात निर्माण झाले, त्या ४४ वर्षांमध्ये समाजात अनेक बदल झाले, जीवनशैली बदलली, लोकांचा स्वतःकडे-समाजाकडे बघण्याचा नजरिया बदलला साहजिकच प्रेमकथांचा ढाचाही बदलत गेला. प्रेम ही भावना जरी सार्वकालीक असली आणि तिचे सत्व-तत्व जरी शाश्वत असले तरी ती व्यक्त करण्याच्या पद्धती बदलतात, प्रेम करणाऱ्यांना विरोध करण्याची कारणे बदलतात, प्रेम असफल झाल्यामुळे उठणारे पडसाद बदलतात आणि हा सगळा बदल या प्रेमकथापटांमधून समोर येत गेला याची जाणीव हे पुस्तक वाचताना होते.