सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. त्या घटनेनंतर राज्यात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महाविकास आघाडीने आंदोलन सुरु केले आहे. सरकारने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याची भूमिका घेतली आहे. राज्यात या प्रकरणावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप होत असताना छत्रपती संभाजीनगरमधील शिवप्रेमी नवीन पुतळा घेऊन पोहचले. त्यांनी त्या ठिकाणी जोपर्यंत नवीन पुतळा बसवला जात नाही, तोपर्यंत हा पुतळा बसवावा, अशी मागणी केली. परंतु प्रशासाने त्यांची मागणी फेटाळत पुतळा परत पाठवला.

मालवण राजकोट किल्ल्यावर बसवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील शिवप्रेमींनी पुतळा आणला होता. परंतु प्रशासनाने हा पुतळा परत पाठवला आहे. धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांनी हा पुतळा आणला होता. हा पुतळा मालवण नगर परिषदेच्या आवारात आणला गेला होता. परंतु प्रशासनाकडून हा पुतळा स्वीकारण्यास नकार दिला.

धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानकडून यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आली. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, राज्यात या प्रकरणावरुन राजकारण सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आम्हाला आणि तमान शिवप्रेमींना दु:ख झाले. जोपर्यंत शासन या ठिकाणी नवीन पुतळा बसवत नाही, तोपर्यंत आपण या ठिकाणी एखादा पुतळा बसवला पाहिजे, हे आमच्या मनात आले. त्यामुळे हा पुतळा घेऊन आम्ही आलो होतो. सध्या आम्ही आणलेला पुतळा राजकोट किल्ल्यावर बसवा. जेव्हा नवीन पुतळा बसवणार तेव्हा आम्ही हा पुतळा परत घेऊन जाऊ, अशी भूमिका आम्ही सांगितली. परंतु प्रशासनाने त्यास नकार दिला.