मुंबईत अवघ्या पहिल्याच पावसात अनेक सखल भाग जलमय झाले. सायन, दादर, कुर्ला, कलिना, चांदिवली असल्फा,चेंबूर, धारावी, हिंदमाता, अंधेरी, मालाड, कांदिवली आदी परिसरांमध्ये पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाण्यातून वाट काढत घरापर्यंत पोहोचावे लागले. महिला, वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.

प्रश्न असा आहे की, दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ढासळलेलीच का दिसते? नालेसाहेब कागदावर स्वच्छ, प्रत्यक्षात मात्र गटारांसारखी अवस्था! हे नक्की कोणाचे अपयश?

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी खालील गंभीर आरोप केले.नालेसफाईचे कंत्राटे हे ठरावीक ठेकेदारांनाच दिले जातात, तेही वर्षानुवर्षे!फक्त कागदोपत्री सफाई दाखवून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जातो. प्रत्यक्षात अनेक नाले अजूनही तुंबलेले आहेत.मुंबई महापालिकेतील संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी संगनमत आहे.

साफसफाईच्या अहवालावर कोणतेही प्रत्यक्ष ‘ऑन-ग्राउंड’ ऑडिट होत नाही, केवळ फाईलवर सही केली जाते. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत. मागण्या नालेसफाई प्रकरणी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी.दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.दर महिन्याला नालेसफाईसंबंधी ऑन-ग्राउंड ऑडिट जाहीर करावे.नागरिकांसाठी ‘नालेसफाई ट्रॅकर’ ॲप विकसित करून पारदर्शक माहिती उपलब्ध करून द्यावी.जलतपासणी प्रयोगशाळा व नालेसफाईच्या कामांवर तृतीयपक्षीय निरीक्षण सक्तीचे करावे. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात पावसाळा म्हणजे दरवर्षीची जलदु:खकथा का ठरावी? मुंबई महापालिकेने तातडीने उत्तर द्यावे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा ॲड. मातेले यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *