अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने (एआयओसीडी) २० मे रोजी एक दिवसाचा देशव्यापी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन औषधविक्रीचे (ई-फार्मसी) वाढते प्रमाण, मोठ्या कंपन्यांचे शोषणात्मक किंमत धोरण, करोना काळातील जीएसआर २२०(ई) आणि जीएसआर ८१७(ई) या अधिसूचना मागे घ्याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी बंद पुकारण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’ आणि ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ या संघटनांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. देशभरातील सुमारे १२ लाख ४० हजार औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणार्या या संघटनांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न प्रलंबित असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. देशात सध्या ऑनलाइनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर औषध विक्री सुरू आहे. अनेक वेळा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिली जातात, बनावट प्रिस्क्रिप्शन वापरले जाते; तसेच अँटीबायोटिक्स औषधे सहज मिळतात. यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे; तसेच मोठ्या कंपन्या कमी किमतीत औषधेविक्री करून छोट्या दुकानदारांना अडचणीत आणत आहेत.
काही जुन्या सरकारी अधिसूचना रद्द करण्याची मागणीही संघटनांनी केली आहे. औषधे ही सामान्य वस्तू नसून, त्यांची विक्री नियमांनुसार आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच व्हावी, असे संघटनांनी स्पष्ट केले आहे. सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे, अशी माहिती ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’चे कार्यकारिणी सभासद प्रसन्न पाटील यांनी दिली.
















Leave a Reply