“आकाचा आका हे शब्द भारतीय जनता पार्टीने आणले, आम्ही आणले नाहीत. बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं, धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही. धस यांना तेव्हाच थांबवलं पाहिजे होतं. तेव्हा त्यांना बोंबाबोंब करायला दिली. बीडमध्ये वातावरण निर्मिती केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार केला” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. “बिहार टाईप माफिया टोळीचं नेतृत्व कोण करत आहे, हे सुरेश धस यांनी महाराष्ट्र आणि देशाला सांगावे. मुख्य सूत्रधार मुंडे आणि त्यांनाच रात्री भेटायला जाता, मग संशय निर्माण होणारच. बीड मधल्या मिर्जापुरचा डॉन मानतात, त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्यांचं समर्थन करतात मिली भगत आहे की काय याच्यामध्ये” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नैतिकतेचा बुरखा फाटला आहे, हे स्पष्ट मी बोलतो. धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही? यापेक्षा कोणी घ्यायचा आहे ठरवलं पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवत आहात हे स्पष्ट मत आहे. मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांनी संतोष देशमुख खुनाचा वापर केला. मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लक्ष विचलित करण्यासाठी हे पहावं लागेल. संतोष देशमुख प्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी याच्याबाबत का नाही लढाई केली” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“मुंबईत न्यू इंडिया बँक लुटली त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. आता कुठे गेले हे मुलुंडचे पोपटलाल. एवढी मोठी बँक लुटली गेली, आता मुलुंडचा पोपटलाल कुठे लपला आहे? कोणत्या बिळात लपला आहे? आता का बोलत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “भारतीय जनता पक्षातील लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही का? गरिबांचा पैसा नाही. सामान्यांचा पैसा नाही, टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे, जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे. आता ते इकडे का जात नाहीत? ईडीला का सांगत नाहीत? आता का पत्रकार परिषद घेत नाहीत? आता का बुच बसले तोंडाला?” अशी टीका संजय राऊत यांनी केली.