बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या घटनेने संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना लाठीचार्ज करून पांगवल्यानंतर १० तासानंतर रेल्वेमार्ग मोकळा केला. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला आहे. या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे शक्ती कायद्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरेंनी त्या संदर्भातील ट्विट देखील केले आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, आम्ही महिलांसाठी दररोज “सेल्फ डिफेन्स क्लासेस” सुरू करण्याचा विचार करतो,यापूर्वी आम्ही सुरू केले होते. परंतु मनातील एक खोल आवाज मला विचारतो पण का? आणि आम्ही लवकरच क्लास सुरू करणार असलो तरी,दुर्दैवाने काळाची मागणी असल्याने, तरीही प्रश्न उरतो असं का आहे? विनयभंग, बलात्काराच्या घटना आपल्याला देशभरातून रोज ऐकायला मिळतात ज्यामुळे आपल्याला राग येतो. त्यामुळे जलद न्याय, निष्पक्ष न्याय आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. मानवते विरुद्धच्या गुन्ह्याला पूर्णपणे सहन न करण्याचे एक गंभीर उदाहरण म्हणजे बलात्कार आहे. आज बदलापूर प्रकरण ऐकून मन हेलावून गेलं. बलात्कार हा बलात्कार असतो. त्यात कुठेही वयाचा फरक नसतो. आम्हाला न्याय हवा आहे आम्हाला कठोर शिक्षेची उदाहरणे हवी आहेत ज्यामुळे या बलात्काऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. मुर्मूजी महाराष्ट्र शक्ती विधेयकाला तिची प्रदीर्घ प्रलंबित संमती देतील, ज्यामुळे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांवरील कायद्याचे सक्षमीकरण होईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

बदलापूर घटनेवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,मी असं ऐकलं आहे की, दोन मुलींवर अत्याचार झालेली बदलापूरची ती शाळा भाजपशी संबंधित कार्यकर्त्याची आहे. भाजपचा पदाधिकारी शाळेचा संचालक आहे. मी यात राजकारण आणत नाही. मात्र कोणताही कार्यकर्ता असला अगदी भाजपाचा किंवा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे.

वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह देखील आता मुक्त आहे. कदाचित त्यालाही निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे आता यात भाजपाचे कार्यकर्ते असतील तर निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार आहात का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

बदलापूर येथील घटनेने समाजमन ढवळून निघाले असताना पुण्यातही अशीच घटना समोर आली आहे. भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १५ ऑगस्टच्या दिवशी घडली. पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गात शिकत आहे. तर अत्याचार करणारा आरोपी हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. आरोपी विद्यार्थ्याचे वय १९ आहे. या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.