kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राज्यात नवं सरकार येताच राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. आजपासून राज्यात देवेंद्रपर्वाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यात नवं सरकार येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट केली आहे.

“आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन”, असं राज ठाकरे सुरुवातीला म्हणाले. ते पुढे म्हणाले, “२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.”

“पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा”, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत १२८ जागांवर उमेदवार उभे केले होते. परंतु, त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. दरम्यान, विधानसभा निवडणूक प्रचारसभांमध्ये आम्ही सत्तेत असू असं राज ठाकरे म्हणाले होते. तसंच, महायुतीला सत्ता स्थान करण्यास पाठिंबा देऊ असंही ते म्हणाले होते. परंतु, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आता नवं सरकार स्थापन होताच त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.