केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. सरकारनं २०२५-२६ च्या रबी हंगामासाठी ६ पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ केली आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळणार असून कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. वाढीव हमीभाव मिळालेल्या पिकांमध्ये गहू, जवस, हरभरा, मसूर, मोहरी आणि केसर यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली. गव्हाची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल १५० रुपयांनी वाढवून २,२७५ रुपयांवरून २,४२५ रुपये करण्यात आली आहे. मोहरीचा हमीभाव ३०० रुपयांनी वाढवून ५,९५० रुपये आणि हरभऱ्याचा हमीभाव २१० रुपयांनी वाढवून ५,६५० रुपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जवस, मसूर आणि केसराचा हमीभाव देखील अनुक्रमे १,९८० रुपये, ६,७०० रुपये आणि ५,९४० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.

हमीभावातील वाढ खालीलप्रमाणे

गहू : २४२५ रुपये प्रति क्विंटल (पूर्वी २२७५ रुपये)

जवस : १९८० रुपये प्रति क्विंटल (पूर्वी १८५० रुपये)

हरभरा : ५६५० रुपये प्रति क्विंटल (पूर्वी ५४४० रुपये)

डाळ : ६७०० रुपये प्रति क्विंटल (पूर्वी ६४२५ रुपये)

मोहरी: ५९५० रुपये प्रति क्विंटल (पूर्वी ५६५० रुपये)

केसर : ५९४० रुपये प्रति क्विंटल (पूर्वी ५८०० रुपये)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *