मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन केले. या घटनेबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागत विरोधकांनाही आवाहन आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा, अस्मिता आहे यावर विरोधकांनी राजकारण करू नये, सर्वांनी एकमताने शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा त्याठिकाणी कसा उभा राहील यासाठी सहकार्य करावे असं शिंदेंनी म्हटलं आहे.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक माफीची मागणी ते करतायेत, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणावर मी एकदा नव्हे १०० वेळा डोकं ठेवायला तयार आहे. १०० वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आम्ही राज्याचा कारभार करतो. मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांनीही सद्बुद्धी द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतळा तिथे उभारण्यासाठी ज्या काही सूचना असतील त्या विरोधकांनी सांगितल्या पाहिजेत. सहकार्य केले पाहिजे. झालेली घटना दुर्दैवी आहे. नौदलाने चांगल्या भावनेने तो पुतळा उभारला पण ही घटना घडलेली आहे. या घटनेचं राजकारण करणे त्यापेक्षा दुर्दैवी आहे. राजकारण करायला इतर मुद्दे आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपली श्रद्धा, दैवत आहे यावर राजकारण करू नये असं त्यांनी सांगितले.

तसेच कालच्या बैठकीत तो संपूर्ण परिसर संरक्षित करावा अशी नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांना तिथे पाहणी करणे आणि हा पुतळा पुन्हा उभं करणे यासाठी ते कटिबद्ध आहे. अजित पवारांनीही जाहीर माफी मागितली. शिवसेना, भाजपा आणि अजित पवार आम्ही सगळे महायुतीत काम करतो. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय राजकारणाचा नाही. हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे. त्यामुळे कुणीही यामध्ये राजकारण न करता शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा तिथं उभा कसा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.