पुण्यात भावे हायस्कूलजवळ 31 मे रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला. भर धाव कारनं टपरीवर चहा पिणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं. हे 12 विद्यार्थी एमपीएससीचे असल्याची माहिती आहे. जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची 1 जून रोजी परीक्षा होती. अपघातात चारजणांचे पाय मोडले तर एका युवतीच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मद्यप्रशान करून तो गाडी चालवत असल्याची माहिती मिळाली आहे.

सदर अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या अपघातामध्ये अविनाश दादासाहेब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलनाझ सिराज अहमद जखमी झाले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

या प्रकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. एक्स वर त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हंटल आहे की, “पुण्यात भावे हायस्कूलजवळील अपघातात एमपीएससी करणारे तरुण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना कदाचित आजचा पेपर देता येणार नाही. या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणे आवश्यक आहे. यासोबतच शासनाने या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च करावा जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा ही विनंती.”

नेमकं काय घडलं?

पेरूगेट येथील श्री नाथसाई अमृततुल्य हॉटेलबाहेर अनेक विद्यार्थी नेहमीप्रमाणे सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास चहा पीत उभे होते. त्यावेळी जंगम महाराज मठाकडून भरधाव वेगाने खासगी प्रवासी टॅक्सी वेगाने आली व ती डाव्या बाजूला अखिल सदाशिव पेठ नवरात्र मंडळाकडे वळली. मात्र, तेथे मुळात अरुंद असलेला निम्मा रस्ता विद्यार्थ्यांनी व्यापला होता. तेथे कारचालकाचे नियंत्रण सुटले व ब्रेक दाबण्याऐवजी त्याने अॅक्सिलरेटरवर पाय दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *