पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी फक्त योजनांची नावं बदलून नामांतर केल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आज केली. उद्धव ठाकरे आज धारावीत बोलताना संकल्प समाजवादी गणराज्याचा संयुक्त समाजवादी संमेलनात बोलताना त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. नितिन गडकरी यांच्या उमेदवारीवरूनही भाजपवर निशाणा साधला. भाजपने जर आज उमेदवारांची यादी जाहीर केली असेल तर मग त्या निष्ठावंतांच्या यादीत मंत्री नितिन गडकरी का नाहीत असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या धारावीच्या सभेतून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांनी भाजपचेही ईव्हीएम मशिनवरून वाभाडे काढले. तर मणिपूरच्या दंगलीवरूनही त्यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राच्या तळाला जाऊ शकतात, पण मणिपुरला जाऊ शकत नाहीत असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला.गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून रामनामाचा जप केला जातो. त्याचवेळी हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही लोकांना भूलथापा दिल्या जातात मात्र आता केवळ रामनामाचा जप नको तर तुमच्यात हिम्मत असेल तर रामराज्य आणा असं थेट आव्हानही त्यांनी यावेळी केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी गेल्या काही सभांमधून भाजपच्या चारेश पारच्या घोषणेलाही जोरदार प्रत्युत्तर देत आता कसे चारशे पार होता ते बघतोच म्हणत त्यांनी थेट भाजपला आव्हान दिले. यावेळी त्यांनी भाजपच्या आणि नरेंद्र मोदींच्या भूलथापांना बळी न पडता त्यांचा कारभारावरून लोकं त्यांना उत्तर देतील असा टोलाही त्यांनी लगावला. 

देशात सध्या लोकशाही नाही तर हुकूमशाही असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे आता आपल्यावर हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी असल्याचे सांगत नागरिकांना त्यांनी नरेंद्र मोदींच्या फसवा फसवीला बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.