गेल्या दोन महिन्यांपासून येरवडा येथील जय जवान नगरमधील अमृतेश्वर गणेश चौक व परिसरातील दोन प्रमुख रस्ते अक्षरशः गटाराच्या पाण्याने डबक्यात रूपांतरित झाले आहेत. रोज पहाटेपासून दुपारपर्यंत लाखो लिटर गटाराचे दूषित पाणी रस्त्यावर साचलेले असते. अनेक ठिकाणी गटारांचे झाकण तुटलेले असून, तिथून बोरवेलप्रमाणे जोरात पाणी बाहेर पडते आणि संपूर्ण वसाहत घुटणापर्यंत पाण्यात बुडते.

या परिसरातील नागरिकांना या गटाराच्या पाण्यातूनच आपले दैनंदिन जीवन चालवावे लागत आहे. विशेष म्हणजे, जिथे हे पाणी साचते त्याच ठिकाणी श्री अमृतेश्वर गणेश मंदिर आहे. मंदिराच्या तीनही बाजूंनी गटाराचे पाणी साचलेले असते. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते आणि मंदिराच्या पायऱ्या देखील पाण्याखाली जातात. दुचाकी गाड्यांमध्ये पाणी घुसल्यामुळे वाहनधारक देखील त्रस्त झाले आहेत.

महापालिकेचा ‘ढाक के तीन पात’ प्रकार

  • नागरिकांनी महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. महापालिकेचे कर्मचारी काही उपाययोजना करतात मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच अवस्था – गटार फाटते, पाणी साचते आणि परिसर डुबतो.
  • या साचलेल्या गटाराच्या पाण्यामुळे विविध आजारांना नागरिक बळी पडत आहेत. त्वचा विकार, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचे संकट निर्माण झाले आहे. काही गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • प्रशासकीय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींचा गैरहजेरी
  • महापालिकेत गेली दोन वर्षे प्रशासक राज सुरू असून, कोणतेही लोकप्रतिनिधी निवडून आलेले नाहीत. त्यामुळे या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. नागरिकांची व्यथा केवळ “नक्कारखान्यात तूती”सारखी ठरत आहे.

स्थानिक नागरिकांची ठाम मागणी:

  1. संपूर्ण परिसरातील गटार लाईन नव्याने बसवावी.
  2. पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
  3. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने वैद्यकीय शिबिराचे आयोजन करावे.
  4. नियमित साफसफाई व देखरेख यासाठी खास यंत्रणा नेमावी.
  5. सार्वजनिक शौचालयांची तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करावी.

या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही, तर संपूर्ण परिसरात सार्वजनिक आरोग्याचे गंभीर संकट उभे राहू शकते. महापालिका प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *