महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरू झालं आहे. हे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्यामुळे सरकार कोणत्या नव्या घोषणा करतंय? राज्यातील आरक्षणाचा तापलेला विषय कशा पद्धतीने मार्गी लावला जातोय? विरोधक सरकारविरोधात कोणते मुद्दे मांडणार? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचारात बुडालेले, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगारी विरोधातील आणि महाराष्ट्राला लुटून खाणारे आहे. जनतेचा विश्वास गमावलेल्या सरकारचा चहा घेणे म्हणजे लोकशाहीचा, तसेच जनतेचा अपमान असल्याची जळजळीत टीका करीत विरोधी पक्षाने बुधवारी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता.