ठाण्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर मंगळवारी संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जमावाने आधी शाळेची तोडफोड केली, त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर गाड्या रोखल्या.जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर लोकांनी दगडफेक सुरू केली. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. 23 वर्षीय आरोपीने 16 ऑगस्ट रोजी शाळेच्या बाथरूममध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. मुलींच्या पालकांनी एका दिवसानंतर (17 ऑगस्ट) एफआयआर दाखल केला. या भागातील महिला पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावरून उद्या मुंबईला परतणार आहेत. बदलापूर केसमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे सातारमधील त्यांच्या दरे या मुळ गावी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी पोहोचले होते.

मंगळवारी सकाळी आठ वाजता संतप्त लोकांनी बदलापूर रेल्वे स्थानकाच्या रुळांवर उभे राहून आंदोलन सुरू केले. अनेक गाड्या थांबवण्यात आल्या. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. दुसरीकडे लोकांनी शाळेत घुसून निदर्शने करून तोडफोड केली. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे कल्याण-बदलापूर लोकल सेवा ठप्प झाली आहे. याच्या निषेधार्थ अनेक संघटनांनी आज बदलापूर बंदची घोषणा केली आहे.

दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले- 10 वर्षांपूर्वी दिल्लीत निर्भयाची घटना घडली आणि दोषींना शिक्षा झाली, पण किती कालावधीनंतर? न्यायास विलंब करणाऱ्यांनाही दोषी धरले पाहिजे. त्याचे राजकारण करू नये. कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेस नेते म्हणाले- ही घटना महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि आरोपींना तीन महिन्यांत फाशी द्यावी, अशी सर्वांची मागणी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर लिहिले – बदलापूरच्या शाळेत लहान मुलींसोबत घडलेली घटना धक्कादायक आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना 12 तास का लागले? एकीकडे ते म्हणतात कायद्याचे राज्य आणि दुसरीकडे पोलिसांचा हा कसला हलगर्जीपणा? महाराष्ट्रातील माझ्या सैनिकांनी हा मुद्दा मांडला आहे. मला महाराष्ट्रातील सैनिकांना सांगायचे आहे की, जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुम्ही या बाबींवर लक्ष ठेवा. सपा नेते अबू आझमी म्हणाले की, देशात दररोज बलात्कार आणि हत्येच्या घटना ऐकायला मिळत आहेत. बदलापूरमध्ये दोन चार वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी समोर आली आहे. हे थांबवायचे असेल तर दोषींना जाहीर फाशी दिली पाहिजे.