पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधी, इंडिया आघाडी तसेच शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि पुणे जिल्ह्यातील महायुतीचे इतर उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अतिशय खोचक शब्दांमध्ये विरोधकांवर निशाणा साधला. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्मा स्वत:चं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात, अशी टीका नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केली.

पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या प्रचारार्थ सभा पार पडली. पुणे तिथे काय उणे. या भूमीवर महात्मा फुले यांच्यासारखे समाजसुधारक दिले. पुणे जेवढं प्राचीन आणि तेवढंच फ्युचरिस्टिट आहे, असंही मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले.

आणखी काय म्हणाले पंतप्रधान ?

  • “महाराष्ट्राने खूप काळ राजकीय अस्थिरता पाहिली आहे. मी आज काही सांगण्याआधी स्पष्ट करु इच्छितो की, कुणीही आपल्या डोक्यावर टोपी घेऊ नका. आमच्याइकडे म्हणतात की, काही भटकणाऱ्या आत्मा असतात, ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले असतात, अशा आत्मा भटकत असतात. मग स्वत:चं काम झालं नाही तर इतरांचं काम बिघडवण्यातही त्यांना मजा येते. आमचा महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
  • 1995 मध्ये जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार आलं तेव्हाही या आत्म्याने ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. 2019 मध्ये या आत्माने जनादेशाचा अपमान केला. ते महाराष्ट्राची जनता जाणते. विशेष म्हणजे आज देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज भारताला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचवून देशाला स्थिर, मजबूत सरकारची आवश्यकता आहे”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. महाराष्ट्रात आमची महायुती आहे, ती मजबुतीने इतकी पुढे जावी की, गेल्या 35 ते 40 वर्षात ज्या कमतरता राहिल्या आहेत, त्या पूर्ण भरुन काढतील, आणि विकसित भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं काम होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.