महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि ठाकरे गटाच्या विधानसभेच्या उमेदवार राहिलेल्या स्नेहल जगताप आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश होईल. स्नेहल जगताप यापूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यावर त्यांची तोफ अवघ्या राज्याने पाहिली. पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आता त्यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात यामुळे भरत गोगावलेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, याप्रकरणी स्नेहल जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
“विधानसभा निवडणुकीत मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत माझ्यावर ९२ हजार लोकांनी विश्वास दाखवला. त्या विश्वासाला डोळ्यांसमोर ठेवून, विकासात्मक दृष्टीकोन ठेवून माझा मतदारसंघ पुन्हा प्रगतीपथावर आणणायचा आहे, त्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं स्नेहल जगताप म्हणाल्या.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष सोडण्यामागचे कारण काय? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “निवडणुकीनंतरही आम्ही साहेबांच्या कायम संपर्कात होतो. पक्षनेतृ्त्वावर कोणतीही नाराजी नाही. त्यांच्यावर प्रेम, आदर आहेच. ते कायम राहणार आहे. पण स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”
Leave a Reply