जम्मू आणि काश्मीर येथील मतदारांनी निवडणुकीचा उत्सव उत्तम प्रकारे साजरा झाला. याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांचे आभार मानले. आज आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहोत. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार आहेत, त्यापैकी ४.९८ कोटी पुरुष मतदार आहेत तर ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. अशी माहितीही राजीव कुमार यांनी दिली.

आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौऱ्यादरम्यान आम्ही निवडणुकीची तयारी योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची माहिती आम्ही घेतली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही गोष्टी घडल्या होत्या त्या टाळण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. लोकांची मतदानासाठी रांग लागते त्यावेळी काही अंतरावर खुर्ची किंवा बाक रचण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. ८५ वर्षे आणि त्यावरच्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे. तसंच या मतदारांच्या गोपनीयतेची काळजी आम्ही घेऊ त्यासंदर्भातली पूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांची पार्श्वभूमी तीनवेळा वृत्तपत्रात द्यावी लागेल. आम्ही जेव्हा महाराष्ट्रात बैठका घेतल्या तेव्हा आम्ही त्यासंदर्भातले कठोर निर्देश आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि इतर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यात सर्व मतदारांचा सहभाग आवश्यक आहे.

महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक?

महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *