बदलापूरच्या घटनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नियमित पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं असं म्हटलय. त्यांनी विरोधकांवर संशय व्यक्त केलाय असा प्रश्न खासदार संजय राऊत यांना विचारला. “त्यांनी आमच्यावर संशय व्यक्त केला पाहिजे. या राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा आहे. ज्याचा दिवसातला अर्धावेळ संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्र, तंत्र अंधश्रद्धा या कामात जातो. त्यांना असा संशय येण स्वाभाविक आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“त्यांना कदाचित असही वाटलं असेल की, बदलापुरातलं आंदोलन हजारो, लाखो लोक रस्त्यावर उतरले होते, त्यांच्यावर कोणीतरी जादूटोणा केला असेल. कारण ते जादूटोपणा प्रेमी आहेत. त्यांनी डोळे नीट उघडले तर त्यांना दिसेल बदलापुरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. एकाचवेळेला तुमच्या मुलाच्या मतदारसंघातले लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. तुम्ही किंवा तुमचा मुलगा आंदोलकांच्या भेटीला जाऊ शकले नाहीत. एवढे तुम्ही भयग्रस्त होता, घाबरला होता” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“पोलीस बदलापूरच्या त्या महिलेची तक्रार नोंदवून घ्यायला तयार नव्हते. पोलिसांनी 10 तास तक्रार नोंदवून घेतली नाही. हे विरोधकांनी केलं काय?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. महाराष्ट्राला मूर्ख समजलात काय? विरोधकांना एवढीच काम आहेत का?. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अत्याचार सुरु आहेत. पुण्यात, अकोल्यात मुख्यमंत्री काय करतायत?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली, त्यावर नितेश राणे म्हणाले की, कळ काढली तरी सुरक्षा मिळते, यावर संजय राऊत म्हणाले की, “त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे, काढून घ्या. त्यांनी कोणाची कळ काढलीय. याचा अर्थ केंद्रातल्या सरकारवर तुमचा विश्वास नाहीय. अमित शाहंना तुम्ही पत्र लिहा, सांगा त्यांना तुम्ही मुर्ख आहात, तुम्हाला कळत नाही”