राज्यात दुसऱ्या टप्प्यात आज आठ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत चुरशीच्या लढती होणार आहेत. प्रकाश आंबेडकर, नवनीत राणा, प्रतापराव जाधव, संजय जाधव, प्रतापराव चिखलीकर आदी उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. विदर्भातील पाचपैकी वर्धा, यवतमाळ-वाशीममध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असून अकोला, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. येथे तिसऱ्या उमेदवाराकडून होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात तिरंगी लढत होत आहे. एकूण ३७ उमेदवार रिंगणात असून बहुसंख्य कुणबी-मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पािठब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार आहेत. काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे दिनेश बुब रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, बच्चू कडू महायुतीत असूनही त्यांनी राणांविरुद्ध उमेदवार दिला असून राणांचा पराभव हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची कसोटी

नांदेड मतदारसंघात भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नांदेडमधील राजकीय समीकरणे बदलली. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतरही काँग्रेस संघटना बळकट असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळेच नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची खरी कसोटी आहे.

वर्ध्यात थेट लढत

वर्ध्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. भाजपतर्फे रामदास तडस तर महाविकास आघाडीतर्फे अमर काळे रिंगणात आहेत. तडस यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. अमर काळे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतरही नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. तेली विरुद्ध कुणबी अशी जातीय किनार या लढतीला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीकडे घेतला आहे.

बुलढाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना

वरकरणी युतीविरुद्ध आघाडी अशी वाटणारी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी झाली आहे. त्यामुळे महायुती विरोधातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर तर शेतकरी नेते रविकांत तुपकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. जाधव व खेडेकर हे एकसंध शिवसेनेतील कट्टर सैनिक. त्यामुळे येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होत असून त्याला ‘गद्दार’ विरुद्ध ‘खुद्दार’ अशी किनार आहे. या लढतीत रविकांत तुपकर किती मते घेतात यावरच जय-पराजयाचे गणित ठरणार आहे.