शिवसेनेचे पहिले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज (२३ फेब्रुवारी) निधन झाले. पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण राहिली. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी अशी प्रार्थना करून एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मनोहर जोशी यांचं निधन दुदैवी घटना आहे. मनोहर जोशी माजी मुख्यमंत्री होते. लोकसभेचे सभासद होते. पण त्यापेक्षाही ते एक सच्चे शिवसैनिक होते. कोणत्याही पक्षाच्या किंवा आयुष्याच्या जीवनात चढ-उतार येत असतात. संकटाच्या काळात देखील ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने राहिले. ज्यावेळी शिवसेनाप्रमुखांना बेळगाव आंदोलनादरम्यान अटक झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ता साळवी हे देखील होते. जीवाला जीव देणारे शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहेत, हे दुदैव आहे. मी बुलढाण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करुन लवकरात लवकर मुंबईला पोहचण्याचा प्रयत्न करतोय, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली

मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

काय म्हणाले संजय राऊत?

बुलढाणा येथे माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी मनोहर जोशींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “मनोहर जोशींना आम्ही सर म्हणून संबोधायचो. तर बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत म्हणायचे. शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि महाराष्ट्र व मराठी माणसासाठी एक आदर्श असे ते व्यक्तिमत्व होते. उद्धव ठाकरे आणि मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना आम्हाला ही दुःखद बातमी समजली. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या प्रत्येक आंदोलनात मनोहर जोशी आघाडीवर होते. मुंबईमध्ये सीमाप्रश्नावर आंदोलन झाले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली. तेव्हा त्यांच्याबरोबर मनोहर जोशी होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून राहिले. त्यांनी नगरसेवक पदापासून ते मुंबईचे महापौर, विधानपरिषद आणि विधानसभेतील आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे मुख्यमंत्री, लोकसभेत गेल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्षपद अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा हा प्रवास झाला. त्यामुळे ते शेवटपर्यंत शिवसेनेचे ऋणी राहिले.”

उत्तम वाचक, कडवट मराठी अभिमानी आणि यशस्वी उद्योजक असे गुण त्यांच्यात होते. मराठी माणसाने उद्योग कसा यशस्वी करून दाखवावा, याचे उदाहरण त्यांनी घालून दिले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम, हे आदर्शवत होते. जोशी शिक्षक असल्यामुळे त्यांनी संसदेचे कामही शिस्तीनुसार चालविले. त्यांना सर्व खासदार हेडमास्तर म्हणायचे. पक्षपात न करता संसद कशी चालवावी, हे त्यावेळी त्यांनी दाखवून दिले, असेही संजय राऊत म्हणाले.

ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिले म्हणून त्यावेळी शिवसेनेवर टीका झाली. पण बाळासाहेबांनी कधीही कुणाची जात पाहून पद दिले नाही. कर्तबागारी आणि कर्तुत्व पाहूनच पद दिले. मनोहर जोशींनीही मुख्यमंत्री म्हणून आपले कर्तव्य पार पाडले. बाळासाहेबांची विकासासंबंधी जे स्वप्न होते, ते त्यांनी पूर्ण केले. कश्मीरी पंडितांवर जेव्हा काश्मीरमध्ये अत्याचार होत होते, तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या जोशींना काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देऊ केले होते, असे करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते.

मनोहर जोशींची कारकीर्द

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. १९९५ या वर्षी ते युतीच्या सत्तेत राज्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे. आजारपणामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते होते. ते बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय होते.