राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. या भीषण दुर्घटनेनंतर आता शिवसेना (शिंदे गट) सतर्क झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आता आपल्या पक्षीय कामासाठी किंवा नेत्यांच्या दौऱ्यांसाठी ‘VSR’ कंपनीच्या विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर करणार नाही.
ज्या ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाला अपघात झाला, त्या कंपनीच्या सुरक्षा मानकांबद्दल आणि तांत्रिक बाबींबद्दल सध्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. “नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून, ज्या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला, त्या कंपनीची सेवा वापरणे धोक्याचे ठरू शकते,” असा सूर आमदारांनी लावला होता.
आमदारांच्या भावना लक्षात घेऊन शिंदे यांनी या मागणीला तत्काळ मंजुरी दिली आहे. त्यानुसार, शिवसेनेच्यावतीने यापुढे ‘VSR’ कंपनीचे कोणतेही विमान आमदार किंवा मंत्र्यांच्या प्रवासासाठी वापरण्यात येणार नाही. अजित पवारांच्या निधनानंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत सरकार आणि पक्ष पातळीवर मोठी खबरदारी घेतली जात असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होत आहे.












