केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राने कांदा निर्यातीस मंजुरी दिली असून आता बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राने शुक्रवारी केंद्र सरकारने २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली होती. त्यानंतर आता सर्व प्रकारच्या कांद्यास निर्यात खुली केली आहे.

सरकारने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱी नाराज झाले होते. या निर्णयामुळे सरकारवर चहुबाजुंनी टीका होत होती. त्यानंतर केंद्र सरकारने आज महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कांदा निर्यातीचा केंद्र सरकारचा निर्णय नक्कीच चांगला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. सरकारने आधी गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली होती. या निर्णयवर टीका होऊ लागल्यानंतर व लोकसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली असली तरी हे पुरेसे नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

कांदा निर्यातबंदी उठवल्याच्या निर्णयावर शेतकरी नेते अजित नवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन केलं जातं. ज्यावेळी निर्यात बंदी करण्यात आली. ही निर्यातबंदी उठवण्याची मागणी केल्यानंतर सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुजरातच्या कांद्याला निर्यातीस परवानगी दिली गेली. त्यानंतर सरकारवर टीका होऊ लागल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीस परवानगी दिली गेली. महाराष्ट्रातील निवडणुकांवर परिणाम होईल, हे डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेण्यात आल्याचे अजित नवले म्हणाले.