आषाढी वारी सोहळा जवळ आला आहे. शनिवारी पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली असून आळंदीत बाहेरील वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला आळंदीतून पंढरपूरसाठि प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून आळंदी येथील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता आळंदीत इतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वर्षी देखील दरवर्षी प्रमाणे या सोहळ्यात लाखोंच्या संखेने भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. आळंदीत दाखल होणाऱ्या वाहनांना आज पासून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ही वाहतूक बंदी आज पासून रविवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार आहे.

आळंदी येथील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. चाकण ते चिंबळी फाटा चौकमार्गे आळंदीकडे येणारी वाहने व आळंदी फाटा चाकण येथून आळंदीकडे येणारी वाहने जय गणेश साम्राज्य चौक व अलंकापुरम चौक मार्गे भोसरी चौकातून मॅगझीन चौक मार्गे वळविण्यात आली आहेत.

तर चाकण-शेलपिंपळगाव- वडगाव घेनंदमार्गे आळंदीकडे येणारी वाहने कोयाळी फाटा कोयाळी गावातून मरकळगाव मार्गे वळविण्यात आली आहे. मरकळकडून धानोरे फाटा मार्गे आळंदीकडे येणारी वाहने धानोरे फाटा- च-होली फाटा-मॅगझीन चौक- अलंकापुरम चौक मार्गे पुढे जातील.

भारतमाता चौक-मोशी चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना आळंदीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. येथील वाहतूक ही जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौकातून मॅगझीन चौक मोशीमार्गे चाकण- शिक्रापूर मार्गे वळविण्यात आली आहे.