छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा वारसा जोपासत रयतेचे राज्य निर्माण करणारे राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती राष्ट्रवादी काँग्रेस विविध उपक्रमांनी राज्यभर साजरी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासत आला असून या युगपुरुषांचे सामाजिक सलोखा आणि लोकशाही विचार या मूलमंत्राने दिनांक २६ जून ते १ जुलै या दरम्यान छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करणार आहे.

दिनांक ३० जून रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ‘सामाजिक सलोखा परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे अभ्यासक, व्याख्याते व विचारवंत यांचा सहभाग असणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर ‘कृषी दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १ जुलै रोजी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘कृषी दिनी’ त्या – त्या जिल्हयातील व तालुक्यातील कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालयात ‘तंत्रज्ञानयुक्त शेती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे अशीही माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.