प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी टाटा यांनी ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते.

मात्र बुधवारी संध्याकाळी रतन टाटा यांची प्रकृती जास्त खालावली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *