kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी! ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांत रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असे असतानाच आता ठाणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर येत आहे. येथे अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृत्यूनंतर आता सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात 21 वर्षीय तरुण कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 21 वर्षीय तरुणावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार चालू होते. मात्र उपचारादरम्यान त्याने याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी आहे. सकळी 6 वाजेच्या सुमारास त्यााच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याला 22 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल काल समोर आला होता. त्याची ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याचा आज सकाळी 6 वाजता उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनाची स्थिती काय?

मुंबईत सध्या कोरोना झपा ट्याने वाढत आहे. 23 मे रोजी राज्यात 45 नवे कोरोनाग्रस्त आढळले. यात एकट्या मुंबईत सापडलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ही 35 आहे. सध्या मुंबईतीली कोरोनाग्रस्तांची संख्या ही 185 पर्यंत पोहोचली आहे. आज याच रुग्णसंख्येत काही भर पडण्याची शक्यता आहे. मे महिन्यापासून मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून केले जात आहे.

प्रशासनाकडून काय आवाहन केलं जातंय?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच देशाच्या इतर भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातोय. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणं आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, असे सांगितले जात आहे. सोबतच कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.