राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाढवण येथील कार्यक्रमात शिवरायांची माफी मागितली. त्यानंतर त्यांनी सावरकरांचा दाखला देत काँग्रेसवर हल्लाबोल केला. अशातच आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याविषयी कोणीही स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून भांडवल करू नये. दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. शिवरायांच्या पुतळ्याची घडलेली घटना दुर्दैवी आहे, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

पहा उदयनराजे भोसले यांचं प्रसिद्धीपत्रक जसंच्या तसं

राजकोट मधील पुतळा दुर्घटना ही निश्चितच दुर्देवी आणि अचानक घडलेली (अॅक्सोटेन्टल) घटना आहे. देशातील सर्व जाती धर्मातील नागरीकांमध्ये या घटनेचे दुःख आहे. पुतळा उभारणीतील कच्चा दुवे आणि निसर्गाची अवकृपा या आणि केवळ याच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे.

त्यामुळे या अभागी घटनेचे कोणी स्वतःच्या लाभासाठी राजकारण करुन भांडवल करु नये, विशेष कोणाला लक्ष (टार्गेट) बनविणे टाळले पाहीजे असे आवाहन करतानाच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी, समाजाने संयम बाळगावा. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन झालेच पाहीजे आणि समुद्रतटीय निसर्गनियमांचा आणि वातवरणीय बदलांचा पुरेपुर अभ्यास करुन, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वांना प्रेरणा देणारा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभारला जावा, असे मत आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक कार्याचा आमच्यासह तमाम देशवासियांना सार्थ अभिमान आहे. त्यांची शिकवण आणि राज्यकारभार आजच्या घडीला सुध्दा अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्या कर्तुत्वामधुन प्रेरणा घेवून करोडो व्यक्तींनी आपल्या जीवनाची आदर्शदायी वाटचाल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अल्प आयुष्यातील, अतुलनीय आणि अजोड कार्य आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर एका दिपस्तंभा सारखे आहे. सामाजिक स्तरातील सर्वांना सातत्याने प्रेरणा देणा-या अश्या थोर महापराक्रमी राजाविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे.

राजकोट येथील पुतळा कोसळण्याची दुर्घटना निश्चितच प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायीच आणि निषेधार्य आहे. तथापि या घटनेचे भांडवल करणा-यांकरुन, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्ये होत असतील तर शिवविचारांचा पाईक असणा-यांना कोणालाच ते मान्य होणार नाही. म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकांनी संयम बाळगला पाहिजेय. या घटनेच्या सखोल चौकशी अंती जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन व्हावे आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी भव्य पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा दिमाखात उभारला पाहिजे.