महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत असल्याने सोशल मीडियावरील खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत. सहकारी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एस. एस. संधू यांच्यासमवेत महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना कुमार यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यात दाखल झालेल्या निवडणूक गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्याचे निर्देश राज्य पोलिस अधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेल्या निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ), पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि राज्य सरकारच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी कडक भूमिका घेत सोशल मीडियावरील खोट्या बातम्या परवणाऱ्यांना सोडले जाणार नाही. अशा लोकांविरोधात त्वरीत कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व मतदान केंद्रांवरील किमान सुविधांचा आढावा घेतला आणि राज्यातील मतदानाच्या दिवशी मतदारांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे निर्देश डीईओंना दिले.

सर्व व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी डीईओंनी स्वत: मतदान केंद्रांना भेट द्यावी आणि गर्दीच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांसाठी रांगेत मतदारांसाठी बेंच, पिण्याचे पाणी आणि वाहने पार्क करण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश ही त्यांनी दिले. ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्रे आहेत तेथे मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी योग्य फलक आणि सूचना सुनिश्चित करण्याचे निर्देश ही मुख्य निवडणूक आयुक्तांनी डीईओंना दिले आहेत. योगाने पोलिस अधीक्षकांकडून लोकसभा निवडणुकीतील निवडणूक गुन्ह्यांशी संबंधित एफआयआरची स्थिती मागितली आणि कर्मचारी, ईव्हीएम आणि सोशल मीडियाशी संबंधित सर्व प्रकरणांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, त्यांचे सहकारी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसएस संधू दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत असून पुढील महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. आगामी महाराष्ट्र निवडणुकीत युबीटी शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी आणि भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश असलेली महायुती आघाडी यांच्यात लढत होणार आहे. मात्र, या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.