“हर्षवर्धन पाटील राज्यातील फार मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं अनेक वर्षाचे योगदान फक्त इंदापूर किंवा पुणे जिल्ह्य पुरतं नाही राज्यात राहिलेलं आहे. जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. भाजपवाले त्यांच्याबाबत अपमानास्पद बोलत असतील तर हे दुर्दैवी आहे”, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या इंदापूरमध्ये बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाला आम्ही सुसंस्कृत पक्ष समजत होतो. पुन्हा एकदा त्यांनी हे दाखवून दिले की हे नवीन भाजप आहे. ओरिजनल भाजपा कधीच अशी नव्हती. समरजीत घाटगे यांचे आणि माझे अनेक वर्षांचे अतिशय चांगले संबंध आहेत. आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत आहेत याचा आम्हाला आनंद आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोणी सांगितलं राष्ट्रवादीचे नेते नाराज आहेत? आमचं पण तुम्हीच ठरवणार ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय हा महाविकास आघाडीचाच निर्णय असेल आणि नाराजी कसली इलेक्शन लागलंय युद्ध सुरू झालंय. महागाई, बेरोजगारी ,भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षितता हे आमच्यापुढे आव्हान आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडकी बहिण योजना आम्ही सुरू ठेवणार त्याबरोबर सुरक्षित महिला आणि लेखी योजना आम्ही चालू करणार आहोत.

महाराष्ट्रात एवढा क्राईम नव्हता दुर्दैवाने आता महाराष्ट्रात कायम वाढला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि केंद्र सरकारचा हा डेटा सांगतोय की गुन्हेगारी प्रचंड वाढले आहे. दुर्दैवानं पुणे हे क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालं आहे. जे अगोदर विद्येचं माहेरघर होतं.दौंड मधील घटनेची फास्टट्रॅक कोर्टात तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे. पवार साहेबांचे ट्विट मी पाहिलं नाही, न्यायालयाने काहीतरी निर्णय दिलाय असं कानावर आलं. मी आता महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलणार आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.