मथुरेतून तिसऱ्यांदा लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांनी स्वतःला भगवान श्रीकृष्णाची गोपिका म्हटलं आहे. “मी नावासाठी किंवा प्रसिद्धीसाठी राजकारणात आलेले नाही. मी कोणत्याही भौतिक फायद्यासाठी राजकारणात आले नाही. भगवान श्रीकृष्ण लोकांवर प्रेम करतात, त्यामुळे त्या सर्व लोकांच्या सेवेत काम केलं तर ते मलाही आपला आशीर्वाद देतील” असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

हेमा मालिनी यांनी जीर्ण झालेल्या ‘ब्रज 84 कोस परिक्रमा’च्या विकासाला आपलं प्रथम प्राधान्य असेल असे सांगितले . मथुरेच्या दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमा मालिनी यांनी “ब्रज 84 कोस परिक्रमा पर्यटकांसाठी आनंददायी आणि आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सांगितलं. यासाठीचा डीपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) 11,000 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. मी आदर्श पायाभूत सुविधांसाठी मंजूर उर्वरित निधी मिळवून देईन जेणेकरुन यात्रेकरूंना आवश्यक सुविधा मिळतील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक हे आकर्षक आणि मंत्रमुग्ध होईल. पर्यटनामुळे स्थानिकांसाठी रोजगारही वाढेल. यमुना नदीच्या स्वच्छतेला आपलं दुसरं प्राधान्य असेल असंही हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

नमामि गंगे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच गंगा आणि यमुना नद्यांच्या प्रदूषणाबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचा दावा हेमा मालिनी यांनी केला. त्या म्हणाल्या की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी नमामि गंगे प्रकल्पात रस घेतला तेव्हापासून प्रयागराजमधील गंगेचे पाणी पारदर्शक आणि प्रदूषणमुक्त झाले आहे. पण दिल्ली सरकारने यमुना नदीच्या प्रदूषणाची समस्या सोडवण्यात रस घेतला नाही आणि मथुरेत पवित्र नदी प्रदूषित राहिली. दिल्ली आणि हरियाणातील यमुना स्वच्छ केल्याशिवाय मथुरेत स्वच्छ यमुनेचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकत नाही.”