लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६.०२ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजेच ३६.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. याबरोबरच आंध्र प्रदेशमध्ये ६८.२० टक्के, बिहारमध्ये ५५.९२ टक्के, महाराष्ट्रात ५२.९३ टक्के झारखंडमध्ये ६४.३० टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये ६९.१६ टक्के मतदान झाले. याशिवाय ओडिशात ६४.२३ टक्के, तेलंगणात ६१. ५९ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५८.०२ टक्के मतदान झाल्याचं बघायला मिळालं. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले. यापैकी नंदूरबारमध्ये सर्वाधिक ६०.६० टक्के नागरिकांनी मतदान केले, तर शिरुरमध्ये सर्वात कमी ४३.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. याशिवाय जळगावमध्ये ५१.९८ टक्के, रावेरमध्ये ५५.३६ टक्के, औरंगाबादमध्ये ५४.०२ टक्के, मावळमध्ये ४६.०३ टक्के, पुण्यात ४४.९० टक्के, अहमदनगरमध्ये ५३.२७ टक्के, शिर्डीत ५५.२७ टक्के, बीडमध्ये ५८. २१ टक्के आणि जालनामध्ये ५८.८५ टक्के मतदान झाल्याचं बघायला मिळालं.