राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेच्या लाभावरुन आणि श्रेयावरुन जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचे विधान केले आहे. नागपूरमधील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना, महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले. आपल्याकडून मित्र पक्ष दुखावलं जाईल असे कृत्य कोणीही करु नये. आज जोगेंद्र कवाडे, महादेव जानकर बैठकीत नसले तरी सर्व पक्षाचा सन्मान करू, कोणी कोणाला कमी समजू नका, महायुतीत स्वतः बाहेर राहून दुसऱ्यासाठी औषध मागू नये, असा सल्लाही त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच, लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं.

रोज सकाळी 10 वाजता मुंबईत घराबाहेर येऊन खोट बोलतात, आज गोबेल्स असता तर त्यानेही आत्महत्या केली असती. जबाबदारीची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, अदृश्य शक्तींनी पसरवलेल्या चुकीच्या गोष्टी आपणास दूर कराव्या लागतील. विरोधक सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतात, तुमच्या खोटं बोलण्यामुळे सरडासुद्धा आत्महत्या करेल, असे म्हणत सामंत यांनी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांच्या टीकेवरुन पलटवार केला आहे. तसेच, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवलं जाईल, असेही सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, आता लाडकी बहीण योजना ही निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा आणि प्रचाराचा मुद्दा बनत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलताना, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करू, असे म्हटले आहे.

काँग्रेस आग लावत आहे हे सांगण्याची जवाबदारी आपली आहे, महामानव डॉ. बाबासाहेब यांना निवडणुकीत पराभूत करणारे कोण (काँग्रेस) होते, हे संगण्याची जवाबदारी आपली आहे. काँग्रेस जळतं घर आहे, मला पक्षानं काय दिल हे पाहण्याची वेळ नाही, मी पक्षाला काय दिले हे सांगण्याची वेळ आहे. विरोधक म्हणतात आमचं सरकार आलं तर याला तुरुंगात टाकू,पण विकासाची एक गोष्ट न सांगता बदला घेण्याची भावना बोलून दाखवतात, असेही सामंत यांनी म्हटले.