kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत म्हात्रे कुटुंबाने पक्ष सोडला !

ऐरोली मतदारसंघात म्हात्रे कुटुंबियांचा दबदबा आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी अनिकेत म्हात्रे यांनी दर्शवली होती. मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते.. याच दरम्यान काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांच्या जाण्याने रिक्त झालेले जिल्हाध्यक्षपद म्हात्रे यांच्या मुलाला मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्षपद अरविंद नाईक यांना बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे म्हात्रे कुटुंबीयांची नाराजी आणखीनच वाढली. यातूनच नवी मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर रमाकांत म्हात्रे, यांनी आपल्या पक्षातील पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, त्यांचा मुलगा आणि युवक काँग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष अनिकेत म्हात्रे हेही आपल्या पक्षातील पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईतील काँग्रेस पक्ष अस्तित्वात असेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.

दुसरीकडे, प्रभारी जिल्हाध्यक्षांना डावलत नागपूर जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) च्या बैठकीत निलंबित अध्यक्ष राजेंद्र मुळकांना बैठकीत व्यासपीठावर स्थान देण्याचा मुद्दा आता थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत गेला आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांनी याची थेट तक्रार मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची माहिती आहे. या पत्रात जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आश्विन बैस हे गटबाजीचे राजकारण करीत असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या गणेश पेठेतील कार्यालयात मंगळवारी बैठक घेण्यात आली होती. यावेळी निलंबित जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला प्रभारी अध्यक्ष बाबा आष्टनकर यांना बोलावण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामीण काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला. या प्रकाराबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. या तक्रारीत काँग्रेसच्या एका गटाची बैठक बैस यांनी बोलावली होती. या बैठकीची कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. तसेच कार्यालयात असलेला पक्षाचा बॅकड्रॉप फाडून त्यावर नवीन बॅकड्रॉप लावला. मुख्यद्वारावरील बॅनरही बदलण्यात आले. या सभेसाठी काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनाही बोलवण्यात आले नाही, असे म्हटले आहे.