आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांच्या मेळ्याने पंढरपूर सजले. वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण आले. आषाढी एकादशीनिमित्त मुख्य मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली. आषाढ धारा कोसळत असताना भक्तीरसात वारकरी चिंब झाले. विठ्ठल दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे वळली होती. सुमारे २० लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. विठू नामाच्या जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. मानाचा वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले व कल्पना कैलास उगले या दांपत्याला मान मिळाला. गेल्या पंधरा वर्षांपासून ते वारीला येत आहे. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारीच शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल झाले होते. पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता आणि कन्या दिविजा यांच्यासह केली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शनिवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस लावून पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा विचार करुन २०१८ वर्षीपासून निर्मलवारी सुरुवात केली. याअंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. जी पावले विठुरायाच्या दर्शनाच्या आशेने चालतात, त्या पावलांची सेवा करून विठुरायांच्या चरणाची सेवा केल्याचा प्रत्यंतर यावा, या सेवाभावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्यावतीने चरणसेवा उपक्रम राबवून वारकऱ्यांचे सेवा केली. त्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंढरपूर कॉरिडोरसाठी सर्वांना विश्वासात घेणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.














