kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मन सुन्न करणारा क्लायमॅक्स; हमजाचं पुढे काय होणार?

‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ठरला. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक रणवीर सिंहच्या चित्रपटाच्या या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये ‘धुरंधर 2’ प्रदर्शित झाला. त्यापूर्वी 18 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून पहाटे 3.15 वाजेपर्यंत पेड प्रीव्ह्यू शोज होते. तर देशभरातील एकूण 12422 प्रीमियर शोजसाठी 42.71 कोटी रुपयांची अॅडव्हान्स बुकिंग झाली होती. जवळपास सर्व शोज हाऊसफुल आहेत. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात बरेच प्रश्नसुद्धा आहेत. आदित्य धरने ‘धुरंधर’नंतर दुसऱ्या भागाचं नाव ‘धुरंधर 2’ न ठेवता ‘धुरंधर : द रिव्हेंज’ असं का ठेवलं? रिव्हेंज म्हणजे सूड आणि गोष्ट फक्त सूडाची असेल तर पहिल्याच भागात हमजाने रेहमान डकैतची हत्या करून हा सूड घेतला होता. मग आता या दुसऱ्या भागात नेमकं काय पहायला मिळणार, हमजाची पार्श्वभूमी काय आहे, तो जसकीरत सिंह रंगीपासून हमजा कसा बनला, त्याच्या आयुष्यात असं काय घडलं होतं आणि त्यानंतर ल्यारीमध्ये कोणते बदल होणार.. असे असंख्य प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत.

‘धुरंधर 2’चा रनटाइम 229.06 मिनिटांचा म्हणजे 3 तास 49 मिनिटं आणि 6 सेकंद इतका आहे. दिग्दर्शिक आदित्य धरचा हा फक्त सीक्वेल नाही तर सूडाच्या 8 अत्यंत क्रूर कहाण्या आहेत. हा सूड अजय सन्यालचा आहे, हा सूड हमजाचा आहे, हा सूड जसकीरतचा आहे, हा सूड उजैर बलोचचा आहे, मेजर इक्बालचा आहे. स्क्रीन रायटर सिद्धार्थ अरोरा सहर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित या चित्रपटाच्या कथेविषयी बरेच खुलासे केले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आदित्य धरने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’च्या आधी या दुसऱ्या भागाचं शूटिंग केलं होतं. ‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या कथेविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात..

तुम्हाला पहिल्या भागातील तो सीन आठवतोय का, ज्याने ‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या ट्रेलरचीही सुरुवात होते. या सीनमध्ये कंदहार विमान अपहरणानंतर दहशतवादी जहूर मिस्त्री म्हणतो, “पड़ोस में रहता हूं, गूदे भर का जोर लगा लो और बिगाड़ लो जो बिगाड़ सकते हो|” अभिनेता विवेक सिन्हाने जहूरची भूमिका साकारली होती. आता ‘धुरंधर 2’मध्ये आयबी चीफ अजय सन्याल त्याचा सूड घेतो.

सिद्धार्थने त्याच्या पोस्टमध्ये ‘धुरंधर 2’च्या कथेबद्दल खुलासा करत लिहिलंय, ‘दुसरा सूड हा जसकीरत सिंह रंगीने घेतलेला आहे. ज्याच्या आईवडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकवले जातात. ट्रेलरमध्ये जसकीरत किती हिंसक पद्धतीने लोकांना मारतो, हे आधीच तुम्ही पाहिला असाल. या जसकीरतवर अजय सन्यालची दृष्टी पडते आणि देशाच्या सर्वांत मोठ्या मिशनसाठी तो त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतो. एखाद्या स्पाय चित्रपटात हिरोच्या शारीरिक प्रशिक्षणासोबतच त्याच्या भाषेचं आणि अभिनयाचंही प्रशिक्षण दाखवणारा ‘धुरंधर 2′ हा पहिलाच चित्रपट असेल.’

या कथेत तिसरा सूड हा उजैर बलोचचा आहे. त्याला असं वाटतंय की त्याचा भाऊ रेहमान डकैतला ल्यारीमधील त्याचे शत्रू अरशद पप्पूच्या लोकांनी एसपी अस्लम चौधरीसोबत मिळून मारून टाकलंय. त्यामुळे अरशद पप्पूचा सूड घेण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो. इतकंच नव्हे तर भररस्त्यात तो त्याचा गळा कापून त्याला ठार मारतो. या दृश्यात दाखवलेली हिंसा पाहून अंगावर अक्षरश: काटा येईल.

आता कथेत यापुढे ISI च्या मेजर इक्बालची भूमिका केंद्रस्थानी येते. अभिनेता अर्जुन रामपालने ही भूमिका इतक्या क्रूरतेनं साकारली आहे, की त्याला पाहून प्रेक्षकांनाही खूप चिड येते. मेजर इक्बालला खोटी माहिती पुरवली जाते की रेहमान डकैतचा भाऊ उजैर बलोच हाच ‘हिंदुस्तानी काफिर’ (भारतीय हेर) आहे. उजैरच भारताला ISI च्या प्रत्येक मिशनची माहिती देतोय, असं त्याला वाटतं. त्यामुळे मेजर इक्बाल उजैरला ठार मारून त्याचा सूड घेतो.

सहाव्या क्रमाकांवर जावेद खनानी आणि अल्ताफ खनानी यांच्या सूडाची कथा असेल. हे दोघं तेच बिझनेसमन भावंडं आहेत, जे बनावट नोटांचा व्यवसाय करतात. हमजा जावेदला वीजेच्या हाय व्होल्टेज तारांनी अत्यंत क्रूरपणे मारतो. अल्फाचाही अंत तितकाच क्रूर असणार आहे.

सातव्या क्रमांकावर बडे साहबचा सूड असेल. धुरंधरच्या पहिल्या भागानंतर या भूमिकेची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. ‘धुरंधर 2’मध्ये ही भूमिका कोण साकारणार, बडे साहब म्हणजे नक्की कोण, याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. या बडे साहबच्या भूमिकेवरून या भागात पडदा उचलण्यात आला आहे. बडे साहबला संपवणं हमजासाठी सोपं नसणार आहे. त्यासाठी तो स्वत: ISI मध्ये सामील होतो.

या चित्रपटाच्या शेवटी जहूर मिस्त्रीचा खात्मा होतो. त्यानंतरच अजय सन्यालचं मन शांत होतं. तर हमजा अली मजारी त्याच्या खऱ्या रुपात म्हणजेच जसकीरत बनून हरिमंदिर साहिबच्या दरबारात डोकं टेकवण्यासाठी येतो. तिथे तो पुन्हा पगडी बांधतो आणि गुन्ह्यांची माफी मागतो. लेखक सिद्धार्थ त्यांच्या पोस्टच्या अखेरीस लिहितात, ‘मी या गोष्टीची गॅरंटी देतो की ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा क्लायमॅक्स तुम्हाला इतका भावूक करेल की अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतील. थिएटरमध्ये एक प्रकारची शांतता निर्माण होईल आणि तिथून बाहेर पडल्यानंतर काही क्षण कोणाशीच बोलण्याची इच्छा होणार नाही.’