मंत्री गुलाबराव पाटीव यांनी जळगावात भर सभेत भाजप विरुद्ध जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्य निर्धार मेळाव्याला भाजपचा एकही मंत्री किंवा आमदार, खासदार उपस्थित नव्हते. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या मेळाव्यास उपस्थित नव्हते. या कार्यक्रमाचे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, त्यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदारांना निमंत्रण देण्यात आलेले होते. मात्र या सर्वांनी या निर्धार मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने भर सभेमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी खंत व्यक्ती केली.

“मी निश्चितपणाने भाषणात देखील या संदर्भात बोललो आहे. वरिष्ठांकडे आजच्या मेळाव्यात जे घडलं या गोष्टी मी मांडणार आहे. युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नयेत. याचा परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्रावर होईल. उद्याच्या दिवशी मुंबईला कॅबिनेट मिटींग आहे. त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा प्रकार आम्ही मांडणार आहोत”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.

“लोकसभा निवडणुकीत आपण एकसंघ होतो म्हणून विपरीत वातावरण असताना सुद्धा दोघं सीट आपल्या निवडून आल्या. त्याचप्रमाणे जर आपण विधानसभेत एकसंघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी 11 जागा निवडून येऊ शकतात. मात्र आपल्यात फूट असणं हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे आहे”, अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी मांडली.

“लोकसभेच्या वेळेस भाजपच्या नेत्या स्मिता वाघ उमेदवार नव्हत्या. आम्ही स्वतः उमेदवार होतो. आम्ही हेच सांगायचं, स्मिताताई खासदार होणार नाही नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आहेत आणि त्यांच्या करता मत द्यायचा हा जोगवा आम्ही मागितला. माझ्या मतदारसंघांमध्ये 63 हजाराचा लीड दिला. किशोर आप्पा पाटलांच्या मतदारसंघात लीड दिला. आज भाजपच्या मंडळीला बोलावलेलं असताना देखील आमची भाजपची मंडळी आज आली नाही. याच्यावर आम्ही मार्ग काढू, विनंती करू”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“त्यावेळेस आम्ही नवरदेववाले होतो. भाजपवाले नवरी वाले होते. आता आम्ही नवरीवाले आहोत. भाजपवाले नवरदेव आले आहेत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. कारण नवरदेव वाल्यांना किंमत असते तेव्हा लोकसभेला गुलाबराव पाटलांनी भाजपचा प्रचार केला. आज विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटलाचं म्हणणं आहे की, आम्ही नवरीवाले आहोत. त्यामुळे आता भाजप नवरदेववाले असल्यामुळे त्यांना किंमत आहे. त्यामुळे निश्चितपणाने आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असंही गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *