नागपूरच्या राजभवनात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी महायुतीच्या एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, भाजपचे आमदार नितेश राणेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे बंधू आमदार निलेश राणेंनी ट्वीटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका”, असं म्हणत निलेश राणेंनी ठाकरेंवर घणाघात केला.
“श्री.उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते. पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल. जय महाराष्ट्र!”
दरम्यान, आज नागपूरच्या राजभवनात फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या एकूण 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके,आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ , पंकज भोयर , मेघना बोर्डिकर या आमदारांचा समावेश आहे.














