केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नवनियुक्त एनडीए सरकार पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारकडून अर्थसंकल्पाचं स्वागत केलं असून अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता, शेतकरी व महाराष्ट्राला समृद्ध करणारा असल्याचं म्हटलं आहे. मात्र, दुसरीकडे विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका करताना हा अर्थसंकल्प केवळ बिहार व आंध्रप्रदेशसाठी असल्याचे म्हटले आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींनी’नावडता महाराष्ट्र’ ही योजना सुरू केलेली दिसते, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी म्हटले की, या बजेटमधून महाराष्ट्राला भरीव असं काहीच मिळालं नाही. पंतप्रधान मोदींनी’नावडता महाराष्ट्र’ ही योजना सुरू केलेली दिसते, अशी खोचक टिप्पणी त्यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी’नावडता महाराष्ट्र’ ही योजना सुरू केलेली दिसते.गेल्या १० वर्षात महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली. पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे, तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया उद्ध ठाकरेंनी आजच्या एनडीए सरकारने सादर केलेल्या बजेटवर दिली आहे.

या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला भरीव असं काही मिळालं नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं?याची यादीच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली आहे.